पावसाळा ते गणेशोत्सव फक्त मलमपट्टी
ठाणे : पावसाळ्यापूर्वी खड्डे बुजवा, आता गणेशोत्सवापूर्वी पुन्हा बुजवा... दरवर्षी हाच फॉर्म्युला कशासाठी? भिवंडी आणि नाशिकमध्ये खड्ड्यांमुळे झालेल्या जीवितहानीच्या पार्श्वभूमीवर ठाण्यातही केवळ मलमपट्टी न करता रस्त्यांसाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी पर्यावरण अभ्यासक डॉ. प्रशांत सिनकर यांनी केली आहे. त्यांच्या निवेदनाची मुख्यमंत्री सचिवालयाने दखल घेत ते नगरविकास (२) विभागाकडे वर्ग केले आहे.
ठाणे शहरात शेकडो कोटी रुपये खर्च करून काँक्रीट आणि मास्टिक डांबराचे रस्ते तयार करण्यात आले आहेत. मात्र पावसाळा सुरू झाला की अनेक ठिकाणी पुन्हा खड्डे पडतात. त्यामुळे रस्ते बांधण्यासाठी कोट्यवधींचा खर्च आणि त्याच रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी पुन्हा खर्च, हे चक्र थांबणे गरजेचे आहे.
जलवाहिनी, ड्रेनेज, गॅस पाइपलाइन, वीज आणि दूरसंचाराच्या कामांसाठी चांगले रस्ते वारंवार खोदले जातात. काम पूर्ण झाल्यानंतर अनेकदा रस्ता पूर्वीच्या दर्जाने दुरुस्त न करता तात्पुरती मलमपट्टी केली जाते. पावसाचे पाणी साचल्यानंतर याच ठिकाणी पुन्हा खड्डे पडतात. त्यामुळे रस्ता कोणी, कशासाठी आणि किती काळासाठी खोदला, तसेच खोदकामानंतर तो कोणत्या दर्जाने पूर्ववत केला, याची जबाबदारी निश्चित करणे आवश्यक असल्याचे डॉ. सिनकर यांनी म्हटले आहे.
ठाणे शहरासाठी स्वतंत्र ‘रस्ता खोदकाम व पूर्ववत दुरुस्ती धोरण’ लागू करावे. रस्ता खोदण्यापूर्वी परवानगी बंधनकारक करावी, विविध यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, काम पूर्ण करण्याची निश्चित मुदत ठरवावी आणि रस्ता पूर्ववत केल्यानंतर त्याची गुणवत्ता तपासूनच तो वाहतुकीसाठी खुला करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
नव्याने तयार केलेल्या काँक्रीट आणि मास्टिक डांबराच्या रस्त्यांसाठी हमी कालावधी निश्चित करावा. या कालावधीत रस्ता खराब झाल्यास संबंधित कंत्राटदाराकडूनच दुरुस्ती करून घ्यावी. निकृष्ट कामासाठी पुन्हा नागरिकांच्या पैशातून खर्च करण्याची पद्धत थांबवावी, अशीही मागणी आहे.